Wednesday 12 January 2011

वैदर्भी बोली

वैदर्भी बोली खरेतर संस्कृतशी अधिक जवळीक असणारी. मात्र तिची खुमारी पाहायची असेल तर बुवा उपाध्यांची भगवत् गीता वाचावी. भगवत् गीतेशी एव्हढा लडिवाळपणा करण्याची हिंमत दुसर्‍या कोणत्या भाषेची वा बोलीची झाली असेल असे वाटत नाही.

बुवा लिहितात -

पार्थ म्हणे गा हृषीकेशी ।
या युद्धाची ऐशी तैशी ।
बेहेत्तर आहे मेलों उपाशी ।
पण लढणार नाहीं !

धोंडयात जावो ही लढाई ।
आपल्या बाच्यानें होणार नाही ।
समोर सारेच बेटे जावाई ।
बाप, दादे, काके ।

काखें झोळी, हातीं भोपळा ।
भीक मागून खाईन आपला ।
पण हा वाह्यातपणा कुठला ।
आपसांत लठ्ठालठ्ठी ।

या बेट्यांना नाही उद्योग ।
जमले सारे सोळभोग ।
लेकांनो ! होऊनिया रोग ।
मराना कां !

लढाई का असते सोपी ?
मारे चालते कापाकापी ।
कित्येक लेकाचे संतापी ।
मुंडकीहि छाटती ।

मग बायका बोंबलती घरी ।
डोई बोडून करिती खापरी ।
चाल चाल कृष्णा माघारीं ।
सोड पिच्छा युद्धाचा ।

अरे, आपण मेल्यावर ।
घरच्या करतील परद्बार ।
माजेल सारा वर्णसंकर ।
आहेस कोठे बाबा !

कृष्ण म्हणें, रे अर्जुना !
हा कोठला बे बायलेपणा ?
पहिल्यानें तर टणटणा ।
उडत होतास लढाया ।

मारे रथावरी बैसला ।
शंखध्वनि काय केला ।
मग आतांच कोठें गेला ।
जोर तुझा मघांचा ?

तू बेटया । मूळचाच ढीला ।
पूर्वीपासून जाणतों तुला ।
परि आता तुझ्या बापाला ।
सोडणार नाही बच्चमजी !

अहाहारे भागूबाई !
म्हणे मी लढणार नाही ।
बांगडया भरा कीं रडूबाई ।
आणि बसा दळत !

कशास जमविले आपुले बाप ?
नस्ता बिचार्‍यांसी दिला ताप ।
घरी डारडुर झोप ।
घेत पडलें असते ।

नव्हते पाहिलें मैदान ।
तोवर उगाच करी टुणटुण ।
म्हणें यँव करीन त्यँव करीन ।
आताच जिरली कशानें ?

अरे तू क्षत्रिय की धेड ? ।
आहे की विकिली कुळाची चाड ?
लेका भीक मागावयाचें वेड ।
टाळक्यांत शिरलें कोठूनी ?

अर्जुन म्हणे ‘गा’ हरी !
आतां कटकट पुरे करी ।
दहादां सांगितले तरी ।
हेका का तुझा असला ?

आपण काही लढत नाही ।
पाप कोण शिरीं घेई !
ढीला म्हण की भागूबाई ।
दे नांव वाटेल ते ।

ऐसे बोलोनि अर्जुन ।
दूर फेकूनी धनुष्यबाण ।
खेटरावाणी तोंड करून ।
मटकन्‌ खाली बैसला ।

सौजन्य - साप्ताहिक विवेक, दिवाळी अंक २००२.

गीतेच्या पहिल्या अध्यायाचे हे विडंबन कवि जयकृष्ण केशव उपाध्ये (१८८३-१९३७) यांनी केले आहे - मान्यवर यनावाला.

No comments:

Post a Comment